'रंगीला औरंगाबादी'ने रिपोर्टरला वाऱ्यावर सोडले ...

मुंबई : मीरा रोड मध्ये डान्सबार वाल्यांनी केलेल्या मारहाणीत एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या घटनेची बातमी दैनिक पुढारीने आपल्या मुंबई आवृत्तीत अगदी पाहिल्यापानावर हेडिंगला छापली होती. दरम्यान, दैनिक पुढारीचे रिपोर्टर नरेंद्र राठोड यांनी डान्सबार विरुद्ध झापलेल्या बातमीबद्दल राग आल्याने चक्क पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यानेच राठोड यांना तू रोज कुठल्या रस्त्याने जातो, कधी जातो याची माहिती घेवून त्या फोन कॉलची रेकॉर्डिंग करून ती एका डान्सबार मालकाला पाठवली. पोलिस जनसंपर्क अधिकार्याने केलेली ही रेकॉर्डिंग सोशल मिडियावर व्हायरल होताच मुंबई, ठाण्यातील सर्व पत्रकारांनी व संघटनांनी या घटनेचा निषेध केला.
या घटनेची बातमी बहुतेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली. मात्र मीरा रोडच्या हत्येची बातमी पहिल्या पानावर छापनाऱ्या पुढारीनेच आपल्या रिपोर्टर सोबत घडलेल्या प्रकारची एक ओळही बातमी छापली नाही. पुढारीचे रंगीला औरंगाबादी हे आपल्या पत्रकारांना पाठींबा देण्यासाठी सदैव पुढे असतात अशी पत्रकारिता क्षेत्रात आख्यायिका प्रसिद्ध आहे. मग त्यांनी आपल्याच रिपोर्टरला वाऱ्यावर का सोडले ? याबाबत सध्या उलट सुलट चर्चा सुरु आहे .

.................

ठाणे - दैनिक पुढारीचे रिपोर्टर नरेंद्र राठोड यांचे फोन रेकॉर्ड करून डान्सबार मालकाला पाठवणाऱ्या पोलीस जनसंपर्क अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा व पत्रकारांच्या फोन टपिंगचा जो प्रकार पोलिसांकडून सुरु आहे तो बंद करावा या मागणीसाठी ठाण्यातील सर्व पत्रकार संघांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावेळी फोन टपिंगच्या झालेल्या प्रकारचा निषेध करीत राठोड यांच्या सुरक्षेची मागणी देखील पत्रकारांनी केली.