ई माध्यमांसाठीही पुढील वर्षापासून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-मुख्यमंत्री

मुंबई - विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांची सामाजिक सुरक्षा महत्वाची आहे. त्यादृष्टीकोनातून राज्य शासनाने पावले उचलली असून पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर पुढील वर्षासाठीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ई-माध्यमांसाठी स्वतंत्र पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्य शासनाच्या लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार तसेच गेल्या तीन वर्षातील विविध गटातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट, माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक, लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजेते लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर, दिनकर रायकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे वृत्त संचालक शिवाजी मानकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्याला ज्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो त्यामुळे त्या पुरस्काराची आणि पुरस्कारार्थीची उंची वाढत असते. लोकशाहीला सुदृढ करण्याचे काम माध्यमं करीत असल्याने लोकशाहीमध्ये माध्यमांचे महत्व अधोरेखीत होते. त्यामुळे जबाबदारीतही वाढ होते. हल्लीचा काळ हा बातमी मुल्याचा आहे. मात्र ते करीत असतांना पत्रकारीतेतील शाश्वत मुल्यांची जपणूक करणे महत्वाचे आहे. पत्रकार हा कधीच पुरस्कारासाठी काम करीत नसतो. आपल्याला मिळणारे पुरस्कार हे स्वमुल्यमापनासाठी असतात. आपण ज्या मार्गाने वाटचाल करीत आहोत तो मार्ग योग्य आहे हे मिळालेल्या पुरस्काराने शिक्कामोर्तब होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
पत्रकारितेचे व्रत जोपासताना पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेची जबाबदारी महत्वाची आहे. त्यासाठी राज्य शासनाने पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत ज्येष्ठ पत्रकारांच्या सुचना विचारात घेऊन एक समग्र योजना तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले असून आता सोशल मिडीया आणि
ई- माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या नविन माध्यमांनी लोकांपर्यंत पोच वाढविली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ब्लॉग तसेच अन्य ई माध्यमांसाठी एक स्वतंत्र पुरस्कार देण्यात येईल. 2014 या वर्षाचे पुरस्कार आम्ही याच वर्षी प्रदान करू आणि पुढील वर्षापासून पत्रकारिता पुरस्कारासाठी नामनिर्देशनाची सोय देखील करण्यात येईल. याद्वारे एखादा पत्रकार किंवा व्यक्ती अन्य दुसऱ्या पत्रकाराचे पुरस्कारासाठी नामनिर्देशन करु शकेल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजेते श्री. जोशी  मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या पुरस्काराला मिळालेला प्रतिसाद पाहून या पुरस्कार वितरण सोहळ्याचे नामकरण पुरस्कार महोत्सव केला तर वावगे ठरणार नाही.  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कुठलीही माहिती लपून राहात नाही. माध्यमांनी शासनाच्या विधायक कामांकडे देखील लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून ग्रामीण भागातील पत्रकारांनी विकासात्मक पत्रकारितेकडे लक्ष देण्याचे आवाहनही श्री. जोशी यांनी यावेळी केले.
श्री. कुवळेकर म्हणाले की,  मला मिळालेला हा  जीवनगौरव पुरस्कार माझ्या उर्वरित आयुष्यात अजून गौरवास्पद काम करावे यासाठी आहे असे मला वाटते. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून सगळ्यांचा आहे असे सांगून श्री. कुवळेकर म्हणाले की, आज मराठी माध्यमांमधील मराठी भाषा पाहून चिंता वाटते त्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि माध्यमांनी आपला वैचारिक  उदारमतवाद वाढवला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. 
श्री. रायकर म्हणाले की, पत्रकारांनी राज्याचे, देशाचे हित सांभाळणारी पत्रकारिता केली पाहिजे. राज्य, देशाविषयी आपुलकी  जोपासणारी पत्रकारिता करावी.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभाचे नामकरण आम्ही पुढील वर्षापासून `पुरस्कार वितरण महोत्सव` असे करण्यात येईल, अशी ग्वाही देऊन माहिती विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर म्हणाल्या की, माध्यमांनी शासनाच्या विधायक कार्याची दखल घेऊन  विकास पत्रकारीता जोपासावी. सन 2014 या वर्षातील पुरस्कार येत्या सहा महिन्यात देण्याचे आम्ही नियोजन केले आहे, असेही श्रीमती म्हैसकर यांनी सांगितले.
प्रास्ताविक महासंचालक श्री. ओक यांनी केले. ते म्हणाले की,  जनता आणि शासन यांच्यात समनव्यक   म्हणून माहिती व जनसंपर्क विभाग कार्य करत असतो. आज माहिती तंत्रज्ञानाचा काळ आहे. माहिती व जनसंपर्क विभागही अचूक आणि गतीने माहिती देण्याचे कार्य करत असतो परंतु, माहिती तंत्रज्ञानाचा काळात अत्याधुनिक साधनाची गरज आहे त्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.
राज्य शासनाचा पुरस्कार हा शाबासकीची थापच नाही तर एक ऊर्जा, स्फुर्ती, उत्साह देणारा आहे, असे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेत्यांचे प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त करतांना
श्री. दाचेवार यांनी सांगितले. यावेळी जान्हवी सराटे यांनाही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पुरस्कार निवड समितीचे सदस्य अभिजीत घोरपडे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, अन्य माध्यमांप्रमाणेच सोशल मिडीयाचा विस्तार पाहता त्या माध्यमासंही पुरस्कार देण्यासंदर्भात  सकारात्मक  विचार करावा.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व लोकशाही वार्ताचे संपादक लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी (2011), ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर (2012) आणि लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर (2013) यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचबरोबर वर्ष 2011,2012 आणि 2013 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. रोख रकमेसह, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2011  बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) बीडच्या दै. झुंजार नेताचे विशेष प्रतिनिधी शेख रिजवान शेख खलील यांना (51 हजार रुपये); बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) दै.लोकमत  समाचारचे, जळगांव प्रतिनिधी श्री.मुकेश रामकिशोर शर्मा यांना (41 हजार रुपये);  यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,  मुंबई  येथील उपसंपादक, श्री. इरशाद लतिफ बागवान यांना  (41 हजार रुपये);  पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार तरुण भारतचे मुंबई  ब्युरो चीफ, श्री.नागेश सुदर्शनराव दाचेवार यांना (41 हजार रुपये); तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार दै.सकाळचे कोल्हापूर येथील वरिष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार श्री.भिकाजी ज्ञानू चेचर यांना (41 हजार रुपये);  दादासाहेब पोतनीस पुरस्कार,नाशिक विभाग, दै.लोकसत्ताच्या,नाशिक  प्रतिनिधी,  श्रीमती चारुशीला कुलकर्णी यांना (51 हजार रुपये,यापैकी 10 हजार रुपये दैनिक गावकरी यांनी  (पुरस्कृत); अनंतराव भालेराव पुरस्कार,औरंगाबाद विभाग (लातूरसह), दिव्य मराठी, औरंगाबादचे  विशेष प्रतिनिधी श्री.रवी रामभाऊ गाडेकर यांना (41 हजार रुपये); आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग, ठाणे येथे महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ उपसंपादक श्रीमती अमिता शैलेश बडे यांना  (41 हजार रुपये); नानासाहेब परूळेकर पुरस्कार,पुणे विभाग, श्री.गणेश बाळासाहेब कोरे, बातमीदार, दै.सकाळ ॲग्रोवन,(41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार,कोकण विभाग, दै.लोकमतचे, रत्नागिरी  तालुका प्रतिनिधी,श्री. शिवाजी नामदेव गोरे (41 हजार रुपये), ग.गो.जाधव पुरस्कार,कोल्हापूर विभाग,  महाराष्ट्र टाईम्सच्या कोल्हापूर प्रतिनिधी श्रीमती जान्हवी आनंद सराटे (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग,अकोला येथील दै.लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक, श्री.नरेंद्र भीमराव बेलसरे यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार,नागपूर विभाग,दै.लोकमतचे, नागपूर येथील  उपसंपादक श्री.मिलिंद किर्ती यांना (41 हजार रुपये).
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2012  बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), दै. दिव्य मराठी, सोलापूरचे बातमीदार, श्री.म.युसूफ अ.रहिम शेख, (51 हजार रुपये), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), पुणे येथे  दै.सकाळ टाइम्सचे  विशेष प्रतिनिधी, श्री.शाश्वत गुप्ता रे, (41 हजार रुपये), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), हिंगोली येथील दै.भास्करचे  जिल्हा प्रतिनिधी, श्री.राकेश सुदामाप्रसाद भट्ट, (41 हजार रुपये), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू), दै.इन्कलाबचे  मुंबई येथील पत्रकार श्री.जमिर अहमद खाँन जलिल अहमद खाँन, (41 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी)(मा. व ज.), सांगली येथील माहिती अधिकारी, श्री.सखाराम राऊ माने, (41 हजार रुपये), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, रत्नागिरी येथील टी.व्ही. 9 चे ब्युरो चीफ,  श्री.मनोज प्रभाकर लेले, (41 हजार रुपये),  तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, मुंबई येथील दै.प्रहारचे छायाचित्रकार, श्री.अतुल मोहन मळेकर, (41 हजार रुपये), केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), पुणे, विभागीय माहिती कार्यालयातील छायाचित्रकार, श्री.नितीन उत्तमराव सोनवणे (41 हजार रुपये)
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग, श्री.भिलाजी दिगंबर जिरे वार्ताहर, दै.सकाळ, धुळे आणि श्री.नवनाथ दिघे, प्रतिनिधी, दै.दिव्य मराठी, अहमदनगर यांना विभागून (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार,औरंगाबाद विभाग (लातूरसह), बीड येथील दै.तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी, श्री.भास्कर लक्ष्मण चोपडे  (41 हजार रुपये), आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, मुंबई येथील येथे दै.लोकमतचे  वरिष्ठ प्रतिनिधी श्री.जमीर दाऊद काझी, (41 हजार रुपये),नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग, श्री.मोहन मारुती मस्कर -पाटील,वार्ताहर, दै.लोकमत, सातारा यांना (41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग, उपसंपादक, तरुण भारत, बेळगाव, श्री.रामकृष्ण महिपत खांदारे यांना (41 हजार रुपये), ग.गो.जाधव पुरस्कार,कोल्हापूर विभाग, कोल्हापूर येथील दै.ॲग्रोवनचे बातमीदार,श्री.राजकुमार बापुसाहेब चौगुले यांना  (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती  विभाग, बुलडाणा येथील दै.पुण्यनगरीचे उपसंपादक, श्री.सचिन बलदेव लहाने, (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील  दै.लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक श्री.चंद्रशेखर बोबडे यांना (41 हजार रुपये).
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2013  बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), पुणे येथील दै. सकाळचे विशेष प्रतिनिधी   श्री. ज्ञानेश्वर पांडुरुंग बिजले, (51 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी, श्री. रामचंद्र विठ्ठल देठे यांना  (41 हजार रुपये),  पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, अमरावती येथील जय महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी श्री.प्रशांत जगनराव कांबळे, (41 हजार रुपये),तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, मुंबई येथील आफ्टरनूनचे  श्री.सुशील भोरु कदम, (41 हजार रुपये) 
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग, श्री.अनिकेत वसंत साठे, प्रिन्सिपल करस्पाँन्डंट, लोकसत्ता, नाशिक, (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह), श्री.हरी रामकृष्ण तुगांवकर, बातमीदार, दै. सकाळ, लातूर, (41 हजार रुपये), आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, (41 हजार रुपये), मुंबई लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी  श्री. संजय कृष्णा बापट, (41 हजार रुपये), नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग, श्री.शैलेंद्र अशोकराव पाटील, बातमीदार, दै. सकाळ, सातारा यांना (41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग,श्री. संतोष पेरणे, जिल्हा वार्ताहर, दै. पुण्यनगरी, रायगड, (41 हजार रुपये), ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग, श्रीमती जान्हवी सराटे, प्रतिनिधी, दै.महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर यांना  (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग, अमरावती येथील येथे  दै. दिव्य मराठीचे  प्रतिनिधी, श्री.सतीश ज्ञानेश्वर भटकर, यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील दै.लोकमतचे उपसंपादक श्री.चंद्रशेखर गिरडकर यांना (41 हजार रुपये)
दीपप्रज्वलन आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने समारंभास सुरूवात झाली. सोहळ्यास पुरस्कार निवड समितीचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी तसेच पुरस्कारार्थी पत्रकारांचे कुटुंबिय उपस्थित होते. संचालक शिवाजी मानकर यांनी आभार मानले.  
                                                    0 0 0 0 0