मुंबई ब्युरो चीफ उद्धव ढगे-पाटील यांचा 'देशदूत'ला रामराम!

'देशदूत'चे गेल्या अनेक वर्षांपासूनचे मुंबईतील ब्युरो चीफ उद्धव ढगे-पाटील यांनी नव्या संपादकीय व्यवस्थेच्या मनमानीला न जुमानता पदाचा राजीनामा देवून बाहेर पडणे पसंद केले आहे. यापूर्वी काही कामाचे नसल्याचा ठपका ठेवून ज्यांना नारळ दिला गेला होता त्याच एका जुन्या पत्रकाराला पुन्हा एक कोटींच्या बिझनेस टार्गेटच्या शर्थीवर "कामाचे" म्हणून घेण्यात आल्याचे समजते. टीडीआर, एफएसआय हीही कामे कदाचित अजेंड्यावर असू शकतील, असेही समजते. हे नवे पत्रकार महोदय अलीकडेच दोन वर्षे मुंबई विधीमंडळ वार्ताहर संघाच्या निवडणुकीत सपाटून आपटलेले आहेत.
विक्रम व जनक सारडा यांच्या उपस्थितीत उद्धव यांनी आज नाशकात राजीनामा नोटीस दिल्याची चर्चा आहे. खरेतर देशदूत व ढगे-पाटील हे अतूट असे समीकरण आहे; अन्यथा मुंबईत हा ब्रॅंड ओळखतोच कोण? नगरविकास मंत्रालयात त्यांचे जबरदस्त सोर्सेस आहेत. अर्थात मुंबईच्या मंत्रालयीन पत्रकारितेत अपवाद वगळता, ज्या काही दलालांच्या टोळ्या आहेत; त्यातील अनेकांशी फटकून वागल्याचाही ढगेंना फटका बसला आहे. आता मालकमंडळींनाही एकनिष्ठतेपेक्षा दलाल महत्त्वाचे वाटू लागलेहेत, हे दुर्दैव! तसे जर नसते तर बरखा प्रकरणात सर्व गृहमंत्रालय अंगावर ओढवून घेत "देशदूत"ला ज्याने ओळख, प्रसिद्धी, चेहरा मिळवून दिला; दैनिकाला चर्चेत आणले, त्या ढगे पाटलांना राजीनामा देण्याइतके वैतागण्याची वेळ नक्कीच आली नसती. "देशदूत"ची सर्वत्र अधोगतीच सुरू आहे. कमकुवत लोकांच्या आकर्षणापायी, त्यांच्या भुलथापांना बळी पडून एकाच संस्थेत आयुष्य खर्ची करणारयावर अन्याय म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी; दुसरे काय!